Healthy Recipes

🍪चला भाकरीकडे वळा. 🍪✌
🌾🍞 गव्हाच्या पदार्थांना कायमचे बायबाय करू...👋✋

मी गहू खायचा बंद केला आणि माझं वजन ३० पौंडांनी कमी झालं...

एका प्रसिद्ध कार्डिआॅलजिस्ट तज्ञाने हे समजावून सांगितलं आहे की, आहारातून गहू काढून टाकल्यामुळे तुमचं आरोग्य “सुधारू” शकतं. 

कार्डिआॅलजिस्ट विल्यम डेव्हिस, एमडी, यांनी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीद्वारे बिघडलेली हृदयं दुरुस्त करण्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याचे हे मनोगत खाली लिहलेले आहे.

“मी त्याचंच प्रशिक्षण घेतलं होतं आणि सुरुवातीला मला तेच करायचं होतं,”

ते सांगतात. पण हृदयविकारासंबंधी उत्कृष्ट सेवा पुरवूनदेखील जेव्हा त्यांच्या आईचा १९९५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तेव्हा साहजिकच त्यांना स्वतःच्या व्यवसायाबद्दल वारंवार चिंता वाटू लागली.

“मी रुग्णाचं हृदय दुरुस्त करायचो, पण तो रुग्ण पुन्हा त्याच समस्या घेऊन माझ्याकडे परत यायचा. माझे उपचार एखाद्या बँड-एड सारखे होते, त्यात आजाराचं ‘कारण’ शोधून काढण्याचा काही प्रयत्न नसायचा.”

म्हणून मग त्यांनी आपल्या प्रॅक्टिसचा रोख एका खूपच अज्ञात वैद्यकीय प्रांताकडे – प्रतिबंधाकडे – वळवला आणि पुढची १५ वर्ष त्यांच्या रुग्णांच्या हृदयविकाराची कारणं तपासण्यात घालवली.

त्यातून जे काही शोध लागले ते त्यांच्या न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट-सेलिंग “व्हीट बेली” ह्या पुस्तकात उघड केले आहेत. आपल्या बऱ्याच शारीरिक समस्या, हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा ह्या आपल्या गहू खाण्यामुळे उद्भवतात असं ह्या पुस्तकात म्हटलं आहे.

आहारातून गहू काढून टाकल्यामुळे “आपलं आयुष्य बदलू शकतं.”

“व्हीट बेली” काय आहे?

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल, त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते.

“जेव्हा माझ्या रुग्णांनी गहू खाणं बंद केलं, तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.”

गहू आणि बऱ्याचशा इतर आरोग्यविषयक समस्यांचा संबंध लागू लागतो.

रुग्णांपैकी ऐंशी टक्के रुग्णांना मधुमेह किंवा मधुमेहा पूर्वीची स्थिती होती. मला माहिती होतं की, इतर कशाही पेक्षा गव्हामुळे रक्तातली साखर खूप जास्त वाढते, म्हणून मग मी म्हणालो, “आपण तुमच्या आहारातून गहू काढून टाकूया आणि त्याचा तुमच्या रक्तातल्या साखरेवर काय परिणाम होतो ते पाहूया.”  ३ ते ६ महिन्यांनंतर ते माझ्याकडे परत येत, आणि तेव्हा त्यांच्या रक्तातली साखर खूपच कमी झालेली असे.

पण त्यांच्या ह्या इतर प्रतिक्रिया सुद्धा असत:

“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन ३८ पौंडांनी कमी झालं.” किंवा, “माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स फेकून दिले.”

किंवा “गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.” “माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” आणि अजून काही, आणि अजून काही”.

जर गहू कशापासून बनलेला आहे हे बघितलं, तर त्यात अॅमलोपेक्टिन ए चा समावेश होतो, जे केमिकल फक्त गव्हातच आढळून येतं, आणि जे रक्तातल्या लहान एलडीएल पार्टिकल्सचं प्रमाण खूप वाढवतं – जे की हृदयविकाराचं सर्वात मुख्य कारण आहे.

जेव्हा आहारातून गहू काढून टाकला जातो, तेव्हा ह्या लहान एलडीएल ची पातळी ८० ते ९० टक्क्यांनी खाली येते.

गव्हामध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लायडिन असतं, जे एक भूक वाढवणारं प्रथिन आहे. गहू खाल्ल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीचा कॅलरी इन्टेक दिवसाला ४०० कॅलरीजने वाढतो.

ग्लायडिनचे अफू सारखे गुणधर्म देखील असतात ज्यामुळे त्याचं “व्यसन” लागू शकतं. अन्नविषयक शास्त्रज्ञांना हे जवळजवळ २० वर्षांपासून माहीत आहे.

गहू-मुक्त आहार करणं हे ग्लूटन-मुक्त आहार करण्यासारखंच आहे का..?

"ग्लूटन" हा गव्हाचा फक्त एक घटक आहे.

गव्हातून ग्लूटन काढून टाकलं तरी गहू तितकाच वाईट असेल कारण त्यात अजूनही ग्लायडिन आणि अॅमलोपेक्टिन ए, तसंच इतर अनेक अनुचित घटक असतील.

ग्लूटन-मुक्त उत्पादनं ४ प्राथमिक घटकांपासून बनलेली असतात: कॉर्न स्टार्च, राईस स्टार्च, टॅपिओका स्टार्च किंवा पोटॅटो स्टार्च. आणि हे ४ सुकवलेले, पावडरच्या स्वरूपातले स्टार्च असे पदार्थ आहेत जे रक्तातली साखर अजूनच जास्त वाढवतात.

मी लोकांना अस्सल अन्नाकडे परतण्यास प्रोत्साहित करतो. जसे फळं, भाज्या, कठीण कवचाची फळं आणि बिया, अनपाश्चराईज्ड चीज, अंडी आणि मांस.

हायब्रिडायजेशन सारख्या उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक तंत्रांमुळे ७० आणि ८० च्या दशकात गव्हाचं स्वरूप खरोखर बदललं. गव्हाचा दाणा अधिक छोटा आणि अधिक पुष्ट झाला आणि त्यात ग्लायडिनचे प्रमाण वाढले (जो एक प्रभावी असा भूक वाढवणारा घटक आहे.)

आज आपण जो गहू खातो तो १०० वर्षांपूर्वी खाल्ल्या जाणाऱ्या गव्हासारखा नाहीये.

तुम्ही दररोज ब्रेड/ पास्ता/ चपात्या खायचं बंद केलंत, आणि चिकन आणि भाज्यांसोबत भात खाऊ लागलात, तरीसुद्धा तुमचं वजन कमी होईल कारण तांदूळ रक्तातली साखर गव्हाइतकी वाढवत नाही, आणि त्यात अॅमलोपेक्टिन ए आणि ग्लायडिन सारखे भूक वाढवणारे घटक नसतात. गव्हामुळे जशी कॅलरी इन्टेक मध्ये वाढ होते तशी तांदळामुळे होणार नाही.

काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. प्रत्येकाने गहू खाणं थांबवलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी, मला पक्कं  आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल.

आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खाता ना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.

* जेवणात का खावी  भाकरी… ?

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

* ज्वारीचे फायदे –

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.

ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.

* तुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-

भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या रोजच्या जीवनशैलीचा भाग आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, की' हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.

आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.

भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.  ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा
असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.

* १) ओतलेली भाकरी :-

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता
मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.

* २) गाजराची भाकरी :-

गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.

* ३) कांदा भाकरी :-

मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.

* ४) बटाटा भाकरी :-

बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि
आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)
हि भाकरी कुरकुरीत होते.

* ५) वांग्याची भाकरी :-

भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून
त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.

* ६) लसणाच्या पातीची भाकरी :-

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून
घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.

* ७) फ़णसाची भाकरी :-

८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.
मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.

* ८) शेपूची भाकरी :-

वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.

* ९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-

ऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.
जाड फॉइल वापरुनही करता येते.

* १०) गुळाची भाकरी :-

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.

* ११ ) सोया चंक्सची भाकरी :-

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट
व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले की त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.

१२) केळ्याची भाकरी :-

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते...

👍

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts